गुंज–महागाव या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या डागडुजीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. सध्या हा मार्ग अडगळीत पडला असून केवळ शेतकरी आणि शेतमजूर तसेच इतर सामान्य वर्ग या रस्त्याचा अति अल्प वापर करताना दिसत आहेत.सदर डागडुजीला नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्षात काम निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या रस्त्याची डागडुजी या आधी अनेकवेळा करण्यात आली होती.मात्र या कायम रस्त्यावर खड्डे पडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.डांबरीकरण उखडत चालले आहे. निकृष्ट साहित्याचा वापर,आवश्यक जाडी न ठेवता केलेले डांबरीकरण आणि कामावर योग्य देखरेख नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून केला जात आहे.
गुंज–महागाव रस्ता हा ग्रामीण भागासाठी दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे. शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका व सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा वापर करतात. मात्र सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून याच मार्गावरूगुंज येथे असलेल्या साकार कारखान्याला ऊस वाहतूक याच मार्गावरून होत असते.त्यामुळे किमान शेतकऱ्याचा तरी शेतकऱ्याचा विचार करून सदर रस्ता डागडुजीचे काम दर्जेदार व्हावे अशी जनभावना आहे.या मार्गावरून सध्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे या कामावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर पाहणी न केल्याचा आरोप होत आहे. कागदोपत्री काम पूर्ण दाखवून कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर करण्यात आल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली आहे.यामुळे कोटींच्या कामाची ऐशीतैशी झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.या प्रकरणाची चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पुन्हा करून घ्यावे, अशी जोरदार मागणी गुंज व महागाव परिसरातील नागरिकांकडून होत आहे.