उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाचं भान हरपलं ? आंबोडा जि.प. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमावर संताप; शिक्षण विभागाची बोटचेपी भूमिका चर्चेत

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :-
महागाव तालुक्यातील आंबोडा येथील जिल्हा परिषद शाळेला राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचे सोयर-सुतकच राहिले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निधनाची अधिकृत बातमी कळूनही शाळेतील मुख्याध्यापकांनी श्रद्धांजली अर्पण करण्यापुरते औपचारिकतेचे पालन करत नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य दिले आणि कार्यक्रम सुरूच ठेवला.
या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्व. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी तीव्र खेद व्यक्त करत शाळा प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे, या प्रकरणाकडे महागाव शिक्षण विभागाने अत्यंत हलगर्जीपणे पाहत कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप होत असून विभागाच्या भूमिकेवरही टीकेची झोड उठली आहे.
दरम्यान, गावातील पुढारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी तोंडी तक्रारी केल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा फुपरे यांनी आपली चूक मान्य केली. तक्रारकर्त्यांची माफी मागत त्यांनी सुरू असलेला सांस्कृतिक कार्यक्रम तत्काळ बंद केला.
या घटनेमुळे शासकीय शाळांमधील संवेदनशीलतेचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली असून, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
