जागता, झगडता समाजनायक’ म्हणूनच नामा बंजारा डॉ. प्रकाश राठोड यांचे मानोऱ्यात परखड प्रतिपादन

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
मानोरा :-
तालुक्यातील सोयजना (ता. मानोरा) येथे जगदंबा मंदिर परिसरात आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात अखिल भारतीय तिसरे गोर बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रकाश राठोड यांनी समाजातील विदारक वास्तवावर सडेतोड शब्दांत भाष्य केले.
“सुखिया सब संसार है,जो खावत है और सोवत है दुःखिया दास कबीर है, जो जागत है और रोवत है, या संत कबीरांच्या उक्तीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की,आजच्या काळात हीच भूमिका नामा बंजारा निभावत आहेत.उच्चशिक्षित असूनही परिसरातील दिन-दलित, गोरगरीबांचे प्रश्न पाहून ते सतत जागते राहतात, झगडतात व संघर्ष करतात. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख चळवळीतील ढाण्या वाघ अशी निर्माण झाली आहे, असे मत डॉ. राठोड यांनी व्यक्त केले.
मानोरा तालुक्याच्या सर्वांगीण हितासाठी नामा बंजारा यांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत मांडत,तळप सर्कलमधील अनेक मूलभूत समस्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. रस्त्यांची दुरवस्था,गटार-नाल्यांचे प्रश्न,पुलांची जीर्ण अवस्था,बंद पडत जाणाऱ्या शाळा,ढासळलेली शिक्षणव्यवस्था,अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे होणारे किडनीसारखे गंभीर आजार,गरिबी,शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचणे,जाती-पातीचे राजकारण व अज्ञान,या सर्व मुद्द्यांवर त्यांनी कडाडून टीका केली.
या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणजे मानवतावादावर आधारलेले सर्वांगसुंदर नेतृत्व असल्याचे नमूद करत, नामा बंजारा यांना तळप सर्कलमध्ये संधी दिल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील,असा विश्वास डॉ. राठोड यांनी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने ग्रामस्थांना दिला.कार्यक्रमाला डॉ. विठ्ठल घाडगे, मिसाल, बंडू कोल्हे, सुनील चव्हाण,धनराज चव्हाण,अश्विन चव्हाण, पंकज चव्हाण, विलास राठोड, देविदास आडे, शंकर कोल्हे यांच्यासह आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नायक-कारभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
