शेतकऱ्यांची लूट महागात चढ्या दराने खतविक्री करणाऱ्या कृषी केंद्राचा परवाना रद्द; कृषी केंद्र संचालकांचे धाबे दणाणले 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :–

महागाव तालुक्यातील काळी (दौ.) येथील एका कृषी केंद्र चालकाने शेतकऱ्यांना रासायनिक खत चढ्या दराने विकून थेट लूट केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने कडक पाऊल उचलत संबंधित कृषी केंद्राचा दिनांक २ फेब्रुवारी रोजी सोमवारी परवाना निलंबित केला आहे. या कारवाईने तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहेत.

काळी (दौ.) येथील मे. सलीम अ‍ॅग्रो सेंटर विरोधात शेतकरी राहुल राठोड यांनी केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या दक्षता पथकाने अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान रासायनिक खतांची कमाल विक्री किंमत (एमआरपी) डावलून सर्रास जादा दराने विक्री केल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीत केंद्राकडे खतांच्या खरेदी बिल्लांचा अभाव, साठा रजिस्टर व प्रत्यक्ष उपलब्ध साठ्यात मोठी तफावत, तसेच पास मशीनमधील नोंदी व प्रत्यक्ष साठा यांची जुळवाजुळव न होणे असे गंभीर प्रकार समोर आले.अनेक विक्री बिल्लांमध्ये शेतकऱ्यांचे नाव, सही,वजन, लॉट क्रमांक व व्यापाऱ्याची माहितीच नसल्याचेही आढळून आले.

अनुदानित रासायनिक खतांची विक्री नियमाप्रमाणे पास मशीनद्वारे न करता थेट केली जात असल्याचे, तसेच दरमहा सादर करावयाचा विक्री अहवाल संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडे सादर न केल्याचेही तपासणीत उघड झाले.कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) व तालुका कृषी अधिकारी यांच्या तपासणी अहवालांतील त्रुटी आणि सुनावणीदरम्यान केंद्र चालकाने दिलेला खुलासा असमाधानकारक ठरल्याने अखेर कृषी विभागाने परवाना निलंबनाचा कठोर आदेश दिला.

या कारवाईमुळे तालुक्यात चढ्या दराने रासायनिक खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई केली जाईल,असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.असून चढ्या दराने कृषी साहित्य विक्री,रेट बोर्ड व इतर तपासण्यासाठी महागाव तालुका कृषी विभागाने तपासणी मोहीम सुरू करावी अशी जनभावना आहे.

कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीला कंटाळून प्रगतशील शेतकऱ्याची आत्महत्या ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या प्रगतशील शेतकरी मनोहर नानू राठोड (वय अंदाजे ४५) यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ, प्रेमळ व मितभाषी स्वभावामुळे मनोहर राठोड हे गावात सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. अत्यल्प भूधारक असलेल्या राठोड यांची शेती कोरडवाहू असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हातचा गेल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे नाईक अशोक धर्मा जाधव व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तलाठी तिडके यांना तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे प्राथमिक माहिती कळविली. पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या पश्चात पाच भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ व तातडीच्या ठोस उपाययोजना देण्याची मागणी केली आहे. अडचणीच्या काळात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त होत असून शासनाने तातडीने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या