बिबट्याची दहशत वाढली; संतप्त शेतकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा 

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :-

महागाव शहरालगतच्या शेत परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण केल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.वारंवार दर्शन देत हा बिबट्या कुत्रे,गुरेढोरे तसेच वन्य प्राण्यांची शिकार करत परिसरात मुक्तपणे वावरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रतीक पाटील नरवाडे यांच्या नेतृत्वात सुमारे शंभर शेतकऱ्यांसह वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत जोरदार आंदोलन छेडले. “जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही,तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार,दोन ते तीन दिवसांपूर्वी बिबट्याने एका पाळीव कुत्र्याची शिकार करून परिसरात ठाण मांडले होते.त्यावेळी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती; मात्र त्यांच्या नजरेसमोरूनच बिबट्याने पळ काढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

काल पुन्हा बिबट्याने कुत्र्याची शिकार करून त्याला झाडावर नेल्याची घटना घडली.हा प्रकार लक्षात येताच शेतकऱ्यांनी आरडाओरड करत परिसरातील इतरांना सतर्क केले. त्यानंतर बिबट्या झाडावरून उतरून जवळच्या गोठ्यात शिरला. याबाबत वनविभागाला कळवूनही वेळेत प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याने तेथूनही पळ काढला.

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच बिबट्याचा धोका वाढत असल्याचा आरोप करत “एखाद्या शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच कारवाई होणार का?” असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.दरम्यान,बिबट्याचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरू असून वनविभाग व पोलिस प्रशासन सतर्क झाले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप बिबट्या जेरबंद करण्यात यश आलेले नाही.

परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीला कंटाळून प्रगतशील शेतकऱ्याची आत्महत्या ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या प्रगतशील शेतकरी मनोहर नानू राठोड (वय अंदाजे ४५) यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ, प्रेमळ व मितभाषी स्वभावामुळे मनोहर राठोड हे गावात सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. अत्यल्प भूधारक असलेल्या राठोड यांची शेती कोरडवाहू असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हातचा गेल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे नाईक अशोक धर्मा जाधव व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तलाठी तिडके यांना तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे प्राथमिक माहिती कळविली. पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या पश्चात पाच भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ व तातडीच्या ठोस उपाययोजना देण्याची मागणी केली आहे. अडचणीच्या काळात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त होत असून शासनाने तातडीने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या