अवकाळी पावसाचा रब्बी पिकांवर घात : महागाव-पुसद-उमरखेड-दिग्रस तालुक्यात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २५ फेब्रुवारी 

महागाव :- 

काल सायंकाळी झालेल्या अवेळी वादळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, पुसद, उमरखेड व दिग्रस तालुक्यांतील अनेक शेतशिवारांना तडाखा दिला. काढणीला आलेला गहू, हरभरा तसेच संत्रा व केळी यांसारखी बागायती पिके वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः भुईसपाट झाली. त्यामुळे आधीच दुष्काळ व सततच्या नैसर्गिक संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अनेक ठिकाणी गव्हाच्या शेतात पाणी साचल्याने पीक आडवे झाले असून काढणीस अडथळा निर्माण झाला आहे. हरभऱ्याच्या शेंगा ओलाव्यामुळे काळवंडण्याची भीती व्यक्त होत आहे. तर संत्रा व केळीच्या बागांमध्ये वाऱ्याने फळगळ होऊन झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागात वीजपुरवठाही खंडित झाल्याने सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली.

सततच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून “कधी आसमानी तर कधी सुलतानी” संकटांचा सामना करावा लागत असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शेतमाल हातात येण्याच्या उंबरठ्यावर असताना झालेल्या या नुकसानीमुळे अनेक शेतकरी हतबल झाले असून भविष्यातील शेती नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, शेतकरी नेते मनीष जाधव यांनी जिल्हा प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. तसेच सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांनी या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही, तर शेतकरी वर्ग आणखी संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी आता शासनाच्या मदतीकडे आशेने पाहत आहेत.

कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीला कंटाळून प्रगतशील शेतकऱ्याची आत्महत्या ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या प्रगतशील शेतकरी मनोहर नानू राठोड (वय अंदाजे ४५) यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ, प्रेमळ व मितभाषी स्वभावामुळे मनोहर राठोड हे गावात सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. अत्यल्प भूधारक असलेल्या राठोड यांची शेती कोरडवाहू असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हातचा गेल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे नाईक अशोक धर्मा जाधव व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तलाठी तिडके यांना तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे प्राथमिक माहिती कळविली. पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या पश्चात पाच भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ व तातडीच्या ठोस उपाययोजना देण्याची मागणी केली आहे. अडचणीच्या काळात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त होत असून शासनाने तातडीने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या