वीजेचा लपंडाव सुरूच; पाण्याअभावी ऊस पिकावर संकट,सवना परिसरातील बागायतदार त्रस्त

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :

महागाव तालुक्यातील सवना,वाकोडी आणि वेणी शिवारात ऊस पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. ऊस पिकाला इतर पिकांच्या तुलनेत अधिक पाण्याची गरज असल्याने शेतकऱ्यांना विहीर, बोअरवेल तसेच कॅनॉलच्या माध्यमातून सिंचन करावे लागते. यासाठी सातत्यपूर्ण व पुरेसा वीजपुरवठा अत्यंत आवश्यक असतो. मात्र सध्या वीजेच्या सतत सुरू असलेल्या ‘लपंडावा’मुळे परिसरातील बागायतदार प्रचंड त्रस्त झाले आहेत.

सवना शिवारात वीजपुरवठ्यासाठी ३३ के.व्ही. केंद्र कार्यरत असले तरी सध्या तापमानात वाढ होत असल्याने वीज केंद्रावर ओव्हरलोड निर्माण होत आहे. परिणामी दर तासाला वीजपुरवठा खंडित होत असून सिंचनाच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे ऊस पिकाला पाणी देणे कठीण होत असून पिकांवर ताण निर्माण होत असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान सवना शिवारातील काही भाग गुंज येथील केंद्राशी जोडण्यात आला असला तरी तिकडेही जवळपास अशीच परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढल्यास पिकांची अवस्था काय होईल,याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

याबाबत शेतकरी गोविंदराव देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी केली असता गुंज ते सवना दरम्यानची लिंक लाईन आणि बॅक कॅपेसिटरचे काम अद्याप अपूर्ण असल्याने सबस्टेशनवर ओव्हरलोड येत असल्याची माहिती देण्यात आली.त्यामुळे ही अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना द्याव्यात,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान,ही कामे लवकर पूर्ण न झाल्यास पुढील हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही शेतकरी गोविंदराव देशमुख आणि इतर शेतकऱ्यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेधशी बोलताना दिला. तसेच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना लवकरच लेखी निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीला कंटाळून प्रगतशील शेतकऱ्याची आत्महत्या ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या प्रगतशील शेतकरी मनोहर नानू राठोड (वय अंदाजे ४५) यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ, प्रेमळ व मितभाषी स्वभावामुळे मनोहर राठोड हे गावात सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. अत्यल्प भूधारक असलेल्या राठोड यांची शेती कोरडवाहू असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हातचा गेल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे नाईक अशोक धर्मा जाधव व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तलाठी तिडके यांना तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे प्राथमिक माहिती कळविली. पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या पश्चात पाच भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ व तातडीच्या ठोस उपाययोजना देण्याची मागणी केली आहे. अडचणीच्या काळात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त होत असून शासनाने तातडीने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या