घांटजी (जि. यवतमाळ) येथील जिव्हाळ्याची भिंत संस्थेला भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचा मायेचा हात एका महिन्याच्या किराणा साहित्याचे जिव्हाळ्याने वितरण

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
घांटजी ( जि. यवतमाळ) : सेवेला धर्म मानणाऱ्या आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यास तत्पर असलेल्या भारत सरकार मान्यता प्राप्त भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) यांच्यातर्फे यवतमाळ जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच सामाजिक संवेदनशीलतेच्या धाग्यातून जिव्हाळ्याची भिंत, घांटजी जि. यवतमाळ या सेवाभावी संस्थेला एका महिन्याचा संपूर्ण किराणा साहित्य संच प्रदान करून समाजात मायेची, जिव्हाळ्याची आणि मानवतेची जाणीव पुन्हा अधोरेखित करण्यात आली.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घांटजी येथे भेट देत जिव्हाळ्याची भिंत संस्थेचे दैनंदिन कार्य, सेवा उपक्रम आणि गरजा जाणून घेतल्या. संस्थेमध्ये राहणाऱ्या वृद्ध, निराधार व गरजू व्यक्तींशी संवाद साधून त्यांची मानसिक व वस्तुस्थितीतील आवश्यकता समजून घेतल्यानंतर नांदेड येथील दानशूर व्यक्तिमत्व संजयजी भंडारी यांच्या सहकार्याने या साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे संस्थेच्या दैनंदिन खर्चाचा मोठा ताण हलका झाला असून, सेवाभाव वृद्धिंगत करणारी ही मदत सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
या वेळी भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) चे अमरावती विभागीय अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. दिपक घरझोडे, संदीप मुनोत, बंडूभाऊ तोडसाम, अरविंद जाधव, सुनील मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिव्हाळ्याची भिंत संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून सेवा क्षेत्रात केलेल्या कार्याचे मनापासून कौतुक केले. तसेच, अशी संस्था समाजाच्या मनाला खऱ्या अर्थाने शांतता आणि समाधान देते, असे उद्गारही त्यांनी व्यक्त केले.
सहयोग स्वीकारताना जिव्हाळ्याची भिंत, घांटजी चे संचालक सूरज हेमके यांनी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “मानवी संवेदनांवर आधारित अशा मदतीमुळे संस्थेच्या कार्याला मोठा आधार मिळतो. आम्ही फक्त सेवाभाव ठेवतो; मात्र अशा महासंघांच्या सहकार्यामुळे आमच्या सेवेला बळकटी मिळते. समाजातील दातृत्व हीच आमची खरी संपत्ती आहे.”
घांटजी परिसरात या जिव्हाळ्याच्या उपक्रमाची मोठी चर्चा असून, महासंघाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गरजूंसाठी प्रेमाने, हसतमुखाने केलेली ही मदत मानवतेचा खरा उत्सव असल्याचे मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. समाजात सकारात्मकता पसरविणाऱ्या अशा उपक्रमांमुळे यवतमाळ जिल्हा सेवाभावी उपक्रमांचा आदर्श केंद्र ठरत आहे.
