गाव सारे सुधराया लागले…’; संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित स्वच्छ महागावचा नवा संकल्प”
लोकवेध न्यूज नेटवर्क / महागाव २३ मार्च
महागाव :-
गाव सारे सुधराया लागले… या संतवाणीचा प्रत्यय देत महागाव शहराने स्वच्छता आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे.संत संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामविकासाच्या विचारांनी प्रेरित होत, होळीच्या पावन वातावरणात शहर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे विदर्भ समन्वयक नितीन भाऊ भुतडा यांच्या हस्ते करण्यात आला.
नगरपंचायत कार्यालयापासून सुरू झालेली ही मोहीम संपूर्ण शहरभर युद्धपातळीवर राबविण्यात येत असून, स्वच्छतेसोबतच जनजागृतीचाही प्रभावी संदेश देत आहे. या उपक्रमातून स्वच्छता हीच सेवा” या संकल्पनेला बळ मिळताना दिसत आहे.
दरम्यान,मागील काळात आमदार नामदेवराव ससाने यांच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली सुसज्ज रुग्णवाहिका काही तांत्रिक अडचणींमुळे बंद अवस्थेत होती.आता ही रुग्णवाहिका महागाव येथील सत्य साई ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आली असून,ती लवकरच शहरातील रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती नितीन भाऊ भुतडा यांनी दिली.
नगराध्यक्षा रंजनाताई आडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत सुमारे ३० सफाई कामगारांच्या मदतीने संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी महागाव घडविण्याचा हा प्रयत्न नागरिकांच्या सक्रिय सहभागातून अधिक बळकट होत आहे.
यावेळी बोलताना नितीन भाऊ भुतडा म्हणाले,“संत तुकडोजी महाराजांनी मांडलेल्या ग्रामस्वच्छतेच्या आणि विकासाच्या विचारांना पुढे नेत महागावचा खुंटलेला विकास मार्गी लावण्याचा आमचा निर्धार आहे. रस्ते, नाल्यांची बांधणी,वीज रोषणाई तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यावर आगामी काळात विशेष भर दिला जाईल.
संत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता या ग्रंथातून दिलेल्या ग्रामविकासाच्या संदेशाची प्रचिती देत, महागाव शहर स्वच्छतेच्या दिशेने नव्या उमेदीने वाटचाल करत आहे. दरम्यान या,संदर्भात नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन नगराध्यक्षा रंजनाताई आडे व नगरसेवकांनी केले आहे.


