१ लाख २८ हजार तुपदीपांनी उजळणार मरसुळ–दत्तनगर ; साडेतीन कोटी नामस्मरण पूर्णत्वानिमित्त तीन दिवसीय दिपोत्सव

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड :- या गावात
मरसुळ गावात साडेतीन कोटी नामस्मरणाच्या पवित्र संकल्पपूर्ती निमित्त दिनांक २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान भव्य व आध्यात्मिक वातावरणात १ लाख २८ हजार तुपदीप ज्वलनाचा सामूहिक दिपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी मरसुळ–दत्तनगर येथील भाविकांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात २ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाने होणार असून, सायंकाळी महापूजेने धार्मिक सोहळ्यास प्रारंभ होईल. ५ फेब्रुवारी गुरुवारी दत्तमहाराज, हनुमान व महादेव यांच्या अभिषेकानंतर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर गावातून पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात येईल.
सायंकाळच्या वेळेत प्रत्येक घरासमोर तुपदीप प्रज्वलन करून दिपोत्सव साजरा केला जाणार असून, रात्री ९ वाजता महापूजा झाल्यानंतर उत्तररात्री ते पहाटेपर्यंत नामसंकल्प उजळणी कार्यक्रम होईल. यावेळी गुरुवर्य भगवानगिरी महाराज यांच्या उपस्थितीत काकडा आरती संपन्न होणार आहे.
या दिपोत्सवाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे सलग सांप्रदायिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबविण्याची रूपरेषा आखण्यात आली असून, या उत्सवामुळे परिसरातील नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होऊन सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास भजनी मंडळाचे ज्येष्ठ अभ्यासक व पदाधिकारी बबन शिरडकर, आनंदराव काकडे व अवधूत देशमुख यांनी व्यक्त केला आहे.मरसुळ,दत्तनगरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या अभूतपूर्व आध्यात्मिक उपक्रमाच्या प्रसारणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
