पाठपुराव्याला अखेर यश : पोहरादेवी,दहिसावळी रस्ता रुंदीकरणामुळे बंद असलेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव:-
पोहरादेवी ते दहिसावळी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मागील काही दिवसांपासून पुसद ते कोणदरी या मार्गावरील सर्व एसटी बस फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे काळी सर्कल परिसरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी व शाळकरी मुलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
या पार्श्वभूमीवर काळी सर्कलमधील नाईक समर्थक व सामाजिक कार्यकर्ते सईद पटेल, वसंतराव पवार, रमेश बाबूलाल राठोड व सुधाकर धनसिंग राठोड यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब तसेच मोहिनीताई नाईक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून आजपासून या मार्गावरील सर्व बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. बस सेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवासी नागरिक, शेतकरी, नोकरदार वर्ग तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांनी संबंधित सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींचे आभार मानत, भविष्यातही अशाच प्रकारे जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
