समाजभावनांचा आदर राखत जाहीर दिलगिरी; ‘त्या’ उल्लेखाबाबत माफी
लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव / उमरखेड
महागाव येथील देशी दारू दुकान बंद करण्याबाबत येत्या १६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीतील मजकुराबाबत आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
सदर बातमीत “कलाल आणि दलाल यांच्या आमिषाला बळी पडल्यास त्याचा त्रास स्वतःलाच होईल” असा उल्लेख करण्यात आला होता. ही बातमी पूर्णपणे जनहिताच्या दृष्टीने प्रकाशित करण्यात आली होती. मात्र, या उल्लेखामुळे काही समाजघटकांच्या भावना दुखावल्या गेल्याची बाब समोर आली आहे.
या संदर्भात उमरखेड येथील मिथिलेश भाऊ जयस्वाल यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेध न्यूज शी बोलतांना नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या भावनांचा आदर राखत लोकवेध कडून आता जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.
“सदर बातमीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर आम्ही मनःपूर्वक माफी मागतो. समाजमन दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता. अनवधानाने हा उल्लेख झाला असून याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, जनहिताच्या प्रश्नांवर भाष्य करताना समाजातील सर्व घटकांचा सन्मान राखण्याची भूमिका कायम ठेवली जाईल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
